Search This Blog

Esakal- एषणा (डॉ. श्री बालाजी तांबे)

मनुष्याला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी अवतरलेल्या आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या इच्छा-आकांक्षा-प्रवृत्तींच्या अनुषंगानेही आरोग्याचा विचार केलेला आढळतो. त्यापैकी तीन मूलभूत इच्छांविषयी आयुर्वेदाने केलेले विवरण...
आयुर्वेदामध्ये सर्वांगीण उपचार कशा प्रकारे केले जातात हे आपण पाहिले. चरकसंहितेत पहिल्या अध्यायातच आयुर्वेदशास्त्र हे केवळ रोग झाल्यावर उपयोगात आणायचे शास्त्र नाही तर दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे शास्त्र आहे असे सांगितले, एवढेच नाही तर आयुर्वेदीय तत्त्वांना स्वीकारून जीवन जगणाऱ्यांचे, आयुष्य असे पर्यंत इहलोकात तर कल्याण होईलच पण परलोकातही कल्याण होईल असेही सांगितले.

आयुर्वेदातल्या या श्‍लोकात हेच सांगितलेले दिसते,
तस्यायुषः पुण्यतमो वेदो वेदविदां मतः ।
वक्ष्यते यन्मनुष्याणां लोकयोरूभयोर्हितम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान

आयुष्याचा वेद असणाऱ्या आयुर्वेदशास्त्राचा उगम वेदातून झाला असून ते अतिशय पुण्यकारक आहे आणि त्याचा स्वीकार केल्यास मनुष्याचे उभय लोकांत म्हणजे इहलोक व परलोकातही हित साधले जाईल.

चरकसंहितेमधे तिस्रैषणीय नावाचा अध्याय सांगितला आहे, यातही ही गोष्ट अधिक विस्तृतपणे मांडली आहे.

तिस्रैषणीय म्हणजे तीन एषणा. एषणा म्हणजे इच्छा.
इष्यन्ते अन्विष्यन्ते इति एषणा ।

म्हणजे ज्याचा शोध घ्यायचा, ज्याची इच्छा करायची ती एषणा.

अशा तीन एषणा असतात, पण त्या प्रत्येकाला होतात असे नाही. ज्या व्यक्‍तीचे मन, बुद्धी, पौरुषशक्‍ती (पुरुषार्थ - चांगले कृत्य करण्याची शक्‍ती) व पराक्रम या गोष्टी शाबूत आहेत त्यांना या तीन एषणा असतात.

तद्यथा प्राणैषणा, धनैषणा, परलोकैषणा इति।
... चरक सूत्रस्थान

प्राण एषणा, धन एषणा व परलोक एषणा या तीन एषणा सांगितल्या आहेत.

१. प्राण एषणा - म्हणजे जगण्याची, जीव वाचविण्याची इच्छा. ही इच्छा जन्माला आलेल्या प्रत्येक सजिवाला असते व ती अत्यंत उत्स्फूर्त असते. रोजचे जीवन जगताना, कळत-नकळत आपण ही एषणा अव्याहतपणे पूर्ण करत असतो. जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये अगदी खालच्या थराला असणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना, जीवजंतूंनाही जीवन शाबूत ठेवण्यासाठी करायची धडपड अंगभूतच असते. उदा. जन्माला आलेल्या बालकाला जसा श्‍वास घ्यायला शिकवावा लागत नाही तसेच माशाच्या किंवा कासवाच्या पिल्लाला पोहायला कसे हे उपजतच माहीत असते. सरड्यासारख्या प्राण्यांना आपला रंग बदलण्याची असलेली सोय किंवा काही वनस्पतींना जवळ आलेला किडा किंवा कीटक पानामध्ये गपकन बंद करून खाऊन टाकण्याची सोय निसर्गाने दिलेली असते, ती प्राण-एषणेचाच एक भाग असतो. बहुतेक वेळेला ही क्रिया इतकी उत्स्फूर्तपणे घडते की ती इच्छेमुळे केलेली आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. पण डोळ्यात चुकून जाणाऱ्या बोटामुळे इजा होऊ नये म्हणून निमिषार्धात डोळा मिटला जातो तेव्हा ती क्रिया प्रण एषणेमुळेच होत असते. अन्न शोधण्याची, खाण्याची इच्छा, त्रास होणाऱ्या गोष्टीपासून दूर होण्याची इच्छा, भीती, प्रतिकार करण्याची, एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची प्रवृत्ती, विरोध करणे शक्‍य नसल्यास नमते घेण्याची प्रवृत्ती या सर्वांचा प्राण एषणेत समावेश होतो.

थोडक्‍यात सांगायचे तर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कळत-नकळत केलेली प्रत्येक लहान-मोठी क्रिया ही प्राण एषणेमुळे झालेली असते व जिवाच्या उत्क्रांतीनुसार ती अधिकाधिक विकसित व चौरस होत जाते. अर्थातच मनुष्यासाठी ती केवळ प्राण टिकविण्यासाठी नाही तर जीवन अधिकाधिक संपन्न करण्यासाठी कारणीभूत ठरायला हवी.

स्वस्थस्य स्वस्थवृत्तानुवृत्तिः आतुरस्य विकारप्रशमने।प्रमादः।

प्राणरक्षणासाठी, संपन्न जीवन जगण्यासाठी निरोगी व्यक्‍तीने स्वस्थवृत्ताचे पालन करून आरोग्य टिकविण्याचा प्रयत्न करावा तर रोगी व्यक्‍तीने विकार-प्रशमनासाठी अप्रमाद म्हणजे कोणत्याही प्रकारची चूक न करता योग्य ते उपचार करावेत.

या दोन्ही गोष्टी सांभाळल्या म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या पाळली, मानसिक, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेली कर्तव्ये पार पाडली, नियमांचे पालन केले आणि रोग झालाच तर तो बरा होण्याच्या दृष्टीने आपण मागील काही लेखांत पाहिलेल्या "दैवव्यपाश्रय, युक्‍तिव्यापाश्रय व सत्त्वावजय' अशा तिन्ही प्रकारांनी सर्वांगीण उपचार केले तर प्राणांचे रक्षण होऊन, दीर्घायुष्याचा लाभ होईल, जीवन नुसतेच आरोग्यपूर्ण नाही तर संपन्न रीतीने व सर्वार्थाने जगता येईल.

1 comment:

Anonymous said...

now I stay tuned!

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content