साग्रसंगीत जेवणाच्या वेळी पापड, लोणचे, सांडगे, चार भाज्या, चटण्या, पक्वान्ने असे अनेक पदार्थ खातो तेव्हा आपण असे म्हणत नाही की हा पदार्थांचा अतिरेक झाला. उलट तेव्हा आपण आग्रह करून खाऊ घालतो. मग औषधांच्या अतिरेकाची आपण चर्चा का करतो? कारण शरीराला आवश्यक असणारी, शरीराच्या पेशींची नवनिर्मिती करणारी अन्नयोजना शरीराला हवी असते व ती वैविध्यपूर्ण असणे शरीराच्या दृष्टीने चांगले असते म्हणून चार पदार्थांचा जेवणात समावेश असणे हा अतिरेक आहे असे म्हटले जात नाही. ........
आयुर्वेदीय औषधयोजना जवळजवळ अन्नयोजनेसारखीच असते. शरीरात त्रास होईल असे माहीत असताना शरीरात निर्माण झालेल्या एखाद्या असंतुलनावर वा रोगावर हल्ला करण्यासाठी शरीरात पाठवायचे द्रव्य शरीराला नको असलेल्या पेशीपुरते मर्यादित न राहता त्याचा इतरही पेशींना त्रास होणार आहे, त्यापासून दुसराच काही त्रास उपटण्याची शक्यता असल्यामुळे अशा औषधांचा अतिरेक करू नये, असे म्हणत असावेत.
लक्ष्याच्या बरोबर मध्यभागी लागावा अशी कल्पना करून बाण सोडायचा असला पण बाण सोडायची विद्या संपूर्ण अवगत नसली तर पहिला बाण डावीकडे लागेल, दुसरा उजवीकडे लागेल, तिसरा वर लागेल, चौथा खाली लागेल, अशा तऱ्हेने असंख्य बाण सोडावे लागतील. याचप्रमाणे, रोगावर इलाज करायचा म्हटला तर रोगाचे मूळ कोठे आहे हे न पाहता व त्याच्यावर काय योजना करायची या संबंधी संदिग्धता किंवा चुकीची कल्पना करून घेतल्यामुळे एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरे अशी अनेक औषधे देण्याची वेळ येते. एखादे औषध दिल्यावर त्या औषधाचा परिणाम कमी व दुष्परिणाम अधिक असे असले तर दुष्परिणाम काढण्यासाठी पुन्हा वेगळी योजना व ती योजना करत असताना होणाऱ्या असंतुलनासाठी तिसरी काही योजना अशा प्रकारे दिवसेंदिवस औषधांच्या संख्येत वाढ होत राहिली तर त्यात काही नवल नाही. खरे पाहता औषधाची योजना करत असताना रोग कुठून सुरू झाला, रोग कशामुळे झाला आहे ह्याचा विचार करून त्याच्या मुळावर घाव घातला तर कदाचित थोड्या औषधामध्ये काम भागू शकेल.
सुरुवात मधुमेहाने झाली म्हणून मधुमेहावरची औषधे, मग रक्तदाब वाढल्यामुळे त्यासाठी औषधे, कंपवात सुरू झाला म्हणून कंप कमी करणारी औषधे, शरीराला झिणझिण्या यायला लागल्या तर त्यावर काही औषधे, पचन बिघडले म्हणून पाचक औषधे, बद्धकोष्ठ झाल्याने तो कमी करणारी औषधे, झोप लागत नाही म्हणून झोपेची औषधे, शरीरात रक्त कमी झाल्यामुळे रक्त वाढविणारी औषधे, या सर्व प्रकारात शरीरात कॅल्शियम ओढले जात नाही म्हणून त्यावरची औषधे, या सर्वाला कंटाळून मेंदू नीट काम करत नाही म्हणून मेंदूची औषधे, या सर्व औषधांचा अतिरेक झाल्यामुळे मेंदूवर पडलेल्या अतिरिक्त कामामुळे विसरभोळेपणा सुरू झाल्याने स्मृतिवर्धक औषधे, असे काही दिवस चालल्यास त्वचा खराब होते, सांधे चालत नाहीत, पायातील संवेदना निघून जाते, झालेली जखम बरी होत नाही अशा चक्रात सापडल्यामुळे १०-१२ वेगवेगळ्या प्रकारची औषधे घ्यावी लागत असतील व त्यातील बहुतेक औषधे इतर औषधांचे दुष्परिणाम झाकण्यासाठीच जर दिली जात असतील तर हा औषधांचा अतिरेक टाळावाच लागेल. दोन वेगळ्या गोळ्या घ्यायला नको म्हणून दोन द्रव्यांच्या मिश्रणाची एक मोठी गोळी बनविण्यामुळे हे काम साध्य होणार नाही. साधारण ६९ सालचा प्रसंग आहे.खूप मोठ्या हुद्द्यांवर काम करून निवृत्त झालेले, बराच काही त्रास होत असलेले एक पोलिस खात्यातले एक अधिकारी त्यांची तब्येत दाखवायला माझ्याकडे आले होते. त्यांना नीट चालता येत नव्हते, पाय ओढत ओढत ते चालायचे, त्यामुळे त्यांना गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या दोघांनी काखोटीस धरून आणून बसविले होते.
मी त्यांना विचारले, "सध्या तुम्ही कोणती औषधे घेत आहात'?
त्यावर ते म्हणाले, "एकदा वेळ काढून घरी या, जेवायलाच या, तुम्हाला सगळी औषधे दाखवतोच'.
मी गेलो त्यावेळी त्यांच्या ताटाच्या बाजूला २०-२२ छोट्या-छोट्या ताटल्या, वाट्या होत्या, मी म्हटले, "ह्या सगळ्या वाट्या-ताटल्या कशासाठी'?
त्यावर ते उत्तरले, "ही सगळी माझी औषधे'. काही आयुर्वेदिक, काही होमिओपॅथिक तर काही ऍलोपॅथिक. नशिबाने त्यावेळी अजून काही पॅथी उपलब्ध नव्हत्या.
मी म्हटले, "उद्या तुम्हा पुन्हा माझ्या घरी या, तेव्हापर्यंत मी विचार करून ठेवतो'.
ते ज्यावेळी माझ्या घरी आले तेव्हा मी खुर्चीवर येऊन बसलो व त्यांना म्हटले, "जरा उभे राहता का? जरा खोलीच्या त्या कोपऱ्यापर्यंत चाला'.
ते म्हणाले, "मला तुम्ही औषधांचे काही सांगणार होता ना ?'
मी म्हटले, "सांगतो'.
चार पावले चालल्यावर मी म्हटले, "हॉल्ट, अबाऊट टर्न, क्विक मार्च'.
त्यावर ते चकित झाले, माझ्याकडे वळून म्हणाले, "म्हणजे काय'?
मी म्हटले, "खुर्चीत बसा.'
ते म्हणाले, "मला निवृत्त होऊन खूप दिवस झाले व नोकरीतही अनेक वर्षें मला कोणी क्विक मार्च व हॉल्ट सांगितले नाही. आज तुम्ही मला हुकूम देणारे पहिले भेटलात.'
त्यावेळी माझे वय ३५ तर त्यांचे वय असेल ७५-८०.
मी त्यांना म्हटले, "औषधांचा अतिरेक हाच आहे तुमचा रोग, तुम्हाला ही सगळी औषधे कुणी दिली'?
त्यावर ते म्हणाले, "गेल्या वीस वर्षांत वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी ही सगळी औषधे दिली आहेत.'
मी म्हटले, "पण तुम्हाला हॉल्ट कुणीच व कधीच सांगितले नाही. तुम्ही सर्व औषधे अजून घेत आहात, म्हणून मी धाडस करून तुमच्यासारख्या अधिकारी माणासाला "हॉल्ट' सांगितले. आता सगळे थांबवा, बरे होण्यासाठी औषधांचा अतिरेक थांबवणेच तुम्हाला उपयोगी पडेल.'
सकाळी उठल्याउठल्या, नाश्त्याच्या आधी, नाश्त्याच्या नंतर, अकरा वाजता. जेवणापूर्वी, जेवणानंतर, दोन वाजता.. चार वाजता, सात वाजता, रात्री जेवणाआधी, रात्री जेवणानंतर, झोपण्यापूर्वी, शिवाय रात्री श्वास वगैरे कोंडला तर रात्री उढून पंप किंवा गोळी एवढ्या वेळेला औषधांचा अतिरेक केला तर कसे चालणार? दिवसातून दोन-चार वेळा औषध घ्यायला लागणे ठीक आहे, पण नुसत्या संख्येचा नाही तर वेळांचाही अतिरेक करणे कितपत योग्य आहे?
स्वतःची प्रकृती पूर्णपणे ओळखून औषधे घ्यावीत. औषधात काय आहे, औषधाचे गुणधर्म काय असे लोक आवर्जून विचारतात. पण आपली स्वतःची प्रकृती काय, स्वतःचा गुणधर्म काय, स्वतःच्या शरीरातील कोणता धातू असंतुलित आहे, स्वतःच्या शरीरातून वीर्यक्षय / ओजक्षय होतो आहे का वगैरेंचा विचार कोणीच करत नाही. असा विचार करून कुठले अन्न घ्यायचे व कुठली मोजकीच पण रोगाच्या मुळावर लागू औषधे घ्यायची त्याची योजना करणे इष्ट ठरते व असे केल्यास औषधांचा अतिरेक होत नाही.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५.
www.ayu.de